Sunday, March 22, 2026

श्रद्धा आणि समाज - संस्कार मूल्यांची उणीव:

आपण भारतीय लोकशाही चे पुरस्कर्ते आहोत. देशातील सामाजिक विकासासाठी केलेले हे प्रयोजन नक्कीच उल्लेखनीय कामगिरी बजावत आहे. परंतु सत्तेच्या केंद्रीकरणामुळे त्याचे काही प्रमाणात नकारात्मक पैलू अलीकडे प्रकाशझोतात येताना दिसत आहेत. सत्तेतील राजकीय असुरक्षितेचे रुपांतरण हे गोष्टीतील 'लाकूडतोड्या' च्या ज्या फांदीवर बसलात त्याच फांदीला तोडायला निघालात अशी परिस्थिती आणि अवस्था दिसते. उत्तम दर्जाचे शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा प्रसार जलद गतीने होणे आवश्यक आहे. अर्धवट ज्ञान मानवजातीला संकटात केव्हा नेईल याचा भरवसा नाही. अलीकडील महाराष्ट्रात गाजणारे 'बाबा खरात' हे ज्वलंत प्रकरण अथवा इतर तत्सम घटित समाजाला संकटात आणणारे विश्र्वासघातकी अनेक उदाहरणे आहेत. अशा या प्रवृत्तीला पोषक वातावरण तयार करणाऱ्यांमध्ये संस्कार मूल्यहीन लोकांचीच भर जास्त असते. बाह्य देखावा हा चिरकाल टिकत नाही. उच्चभ्रू वर्गामध्ये संस्कार मूल्य असतील, मग हे घडतेच कसे? म्हणून तो वर्ग एक प्रमाणित वर्ग आहे, असे आपण का वाटून घ्यायचे ? म्हणूनच समाजातील सामान्य अथवा मध्यमवर्गीय लोकांनी कोणताही निर्णय घेताना प्रत्येक गोष्ट ही चाचपून व निरखून घेतल्यानंतरच त्यात पाऊल टाकावे. वैज्ञानिक आणि सामाजिक दृष्टिकोन या दोन गोष्टींचा खोलवर अभ्यास केल्यास अथवा त्यांना पूर्णपणे समजून घेतल्यास ९९ % समस्यांचे निवारण होईल यात कवडी मात्र शंका नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि उपलब्ध सामाजिक चौकट या दोन्हींचा मेळ आवश्यक तसा विणता आला पाहिजे. रक्त, नाते, स्वकीय,आपुलकी आणि समाजजीवन यांच्यामध्ये विज्ञान दृष्टीचे अंगीकारण कशा प्रकारचे असावे यासाठी संस्कार मूल्यांची अत्यंत आवश्यकता दिसून येते. अंधश्रद्धेला, श्रद्धा समजून किंचितही या गोष्टींमध्ये शिरकाव होणार नाही, याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. अशा जबाबदार वर्तनामुळे समाजहित जोपासले जाईल यात काडीमात्र शंका नाही. देशाला फक्त हुशार लोकांचीच गरज नाही, तर संवेदनशील, प्रामाणिक आणि जबाबदार नागरिकांची आवश्यकता असते. आणि त्याची पायाभरणी मूल्य शिक्षणातूनच होते. वैज्ञानिक दृष्टिकोनात आचार विचार असतात, जी मनुष्याला पशुपासून वेगळी करते. विचार करणे हे मनुष्यत्व आहे आणि संवेदना यांना बळी पडणे पशुत्व आहे. अन्नाची जास्त गरज प्राण्यांना असते त्यामुळे मांसाहार यात रमलेला पशुच असतो पण जो विचारशील असतो तो वैज्ञानिक असतो. वैज्ञानिक दृष्टिकोन असण्यासाठी विचारसशील असणे महत्वाचे असते. या पिढीच्या जगण्यात प्रचंड विरोधाभास दिसून येतो. एका बाजूला विज्ञानयुगाने निर्माण केलेल्या विविध उत्तमोत्तम गोष्टी, समाजमाध्यमं, स्मार्टफोन्स, व स्वयंपाकघरातील उपकरणं हे सारे वापरायचे तंत्रज्ञान म्हणून; परंतु जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगायचा नाही. शिक्षण, तंत्रज्ञान आणि आधुनिकता असूनही स्त्रिया अजूनही रूढी, परंपरा आणि अंधश्रद्धांना बळी पडतात. त्यांच्या जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव दिसून येतो. पुरुषप्रधान व्यवस्थेचे प्रतीकात्मक समर्थन करत समाज त्यांना मागे खेचतो. वैज्ञानिक विचारसरणी, संविधानाचे भान आणि समताधिष्ठित समाजासाठी स्त्रिया व पुरुषांनी मिळून बदल घडवायला हवा. लोकहितवादी व सत्यशोधक समाज अंतर्गत कार्य करणाऱ्यांनी या समाजातल्या चुकीच्या रूढी, परंपरा आणि अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी आपले आयुष्य खर्च केले तरीदेखील विचारवंतांच्या चळवळीची प्रतिभा कमी पडते की आपल्या विचारांची? या धर्माचे आणि जातीचे तुष्टीकरण करणाऱ्या रूढी-परंपरा, अंधश्रद्धा, व्रतवैकल्ये अगदी सुशिक्षित स्त्रियांच्याही जीवनातून हद्दपार होत नाहीत, याला काय म्हणावे? आधुनिक कपडे घालणाऱ्या, आधुनिक केशभूषा, वेशभूषा करणाऱ्या, स्मार्टफोन वापरणारा वर्ग तत्त्वांनी आणि विचारांनी मात्र आधुनिक होताना दिसत नाही. पुन्हा-पुन्हा त्या पुरुषसत्ताक व्यवस्थेला बळी पडतात. सध्याचे राज्यकारण अशाच अंधश्रद्धाळू, भोळसट वर्ग तयार करत आहेत. आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन जीवनात रुजवून या व्यवस्थेला सुरुंग लावायचा आहे. वर्तमान परिस्थिती लक्षात घेऊन, संवाद सुरू करावा आणि आपल्या घरातील स्त्रियांना या चुकीच्या रूढी-परंपरांतून बाहेर काढायला मदत करावी. आपल्याकडे अडाणी, अल्पशिक्षित आणि उच्चविद्याविभूषित सर्वजण वैज्ञानिक दृष्टिकोन जगण्यात आणि बाळगण्यात सारखेच मागे आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अर्थ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना माहीत नसतो. ज्यांना माहीत असतो; ती जीवनातील घटनांना कार्यकारणभावाचे सूत्र सहसा लावत नाहीत. विचार करण्याची पद्धत म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला, तरच ही कोंडी फुटू शकते. यासाठी शिक्षणक्षेत्रात प्रत्यक्ष प्रयत्न करणे गरजेचे आहे. सध्या अवघा अठरा वर्षांचा तरुण मतदान करतो. आपल्या देशाचे भवितव्य ठरवतो. आपले एक मत म्हणजे स्वत:चे मूल्य असते; परंतु आजच्या शिक्षण व्यवस्थेत म्हणजेच शालेय व महाविद्यालयीन पातळीवर काहीही प्रशिक्षण मिळत नाही. या पातळीवर शिक्षणात वैज्ञानिक दृष्टिकोन जेवढ्या प्रभावीपणे रुजेल, तेवढ्या प्रमाणात सध्याची स्थिती बदलू शकेल. आपल्या घरी-दारी होणारे आचरण या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रभावाखाली करण्याची सवय प्रत्येकाला लागली पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन फक्त शिकण्याची नाही, तर आपल्या आचरणात आणण्याची बाब आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्येकात रुजायचा असेल, तर सत्य फक्त माहीत असून चालत नाही, तर ते निर्भयपणे सांगण्याचे धाडस त्यांच्यात आले पाहिजे. जुन्या मतांना बुजून न जाण्याचे धैर्य हे विज्ञानाने दिलेले अपूर्व मूल्य आहे. म्हणजेच विज्ञान हे अंतिम सत्यावर नव्हे, तर सत्याच्या सातत्यावर उभे असते. थोडक्यात, वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होणे कठीण; पण अशक्य नाही. तो शुभाशीर्वादाने प्राप्त होत नाही. कारण कोणत्याही शुभाशीर्वादात सुष्ट किंवा दुष्ट शक्ती नसते. वैज्ञानिक दृष्टिकोन उपदेशाने, अध्ययनाने, अध्यापनाने किंवा शारीरिक, बौद्धिक श्रमाने प्राप्त होत नाही. त्यासाठी आपल्या मनावरील अनेक निरुपयोगी संस्कार, अनेक निरुपयोगी रीतिरिवाज, परंपरा, अहंकार व श्रेष्ठत्वाची भावना इत्यादी कालबाह्य विचारसरणी झटकून टाकली पाहिजे. भारतातील, विविध पातळ्यांवरील प्रश्न हे वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अभावामुळे निर्माण झाले आहेत. म्हणून शालेय, महावियालयीन व समाज जीवन पातळीवर शिक्षणातून वैज्ञानिक दृष्टिकोन जेवढा प्रभावीपणे रुजेल, तेवढ्या प्रमाणात आजची स्थिती बदलू शकेल. रचना: स्नेहयश.

Tuesday, March 17, 2026

देशाचा विकासाचा केंद्रबिंदू- विद्यार्थी-सद्यस्थिती :

साधन हे आपण कसे वापरतो, त्यावर ते फायदेशिर की वाईट हे अवलंबून असते. भ्रमणध्वनी चे तसेच आहे. भ्रमणध्वनी मुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. तथापि कोणत्याही गोष्टींचा अति वापर हा वाईटच. तसेच भ्रमणध्वनीच्या अतिरेकी वापराचे दुष्परिणाम, त्याच्या आहारी जाण्याचे कोणत्या सामाजिक समस्या निर्माण होऊ शकतात. यावरील हा ऊहापोह. अलीकडचीच एक ग्रामीण भागातील शालांत विद्यार्थ्यांनी, आपल्या मित्रांना हत्याराने मारल्याची घटना घडली. पालकांनी भलत्यानाच दोषी धरले. पालकांचे बरोबर आहे. परंतु पालकांनी हा विचार केला पाहिजे की, मुलांच्या या वर्तनाला जबाबदार कोण ? या मागची तपासणी केली पाहिजे. मुलांमध्ये एवढा आक्रमकपणा का आला आहे? यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. कोरोना नंतर शैक्षणिक क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्र एका विचित्र अशा परिस्थितीतून जात आहे. साथीच्या रोगांच्या काळात विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी भ्रमणध्वनी वापरण्याची परवानगी देण्यात आली. विद्यार्थ्यांनी भ्रमणध्वनी वापरायला सुरुवात केली. आणि त्याची शैक्षणिक वाताहत सुरू झाली. तसेच त्यासोबत अनेक सामाजिक समस्या देखील निर्माण झाल्या. विद्यार्थी भ्रमणध्वनीच्या इतक्या आहारी गेले आहेत, की ते त्याच्याशिवाय एक क्षणही राहू शकत नाहीत. शेजारील बड्या या देशांमध्ये वयाच्या १८ वर्षापर्यंत मोबाईल आणि सोशल मीडिया वापरायची परवानगी नाही. त्यामुळे तेथील विद्यार्थी सर्वच क्षेत्रांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांच्या पुढे आहेत. शैक्षणिक, क्रीडा, संशोधन अशा सर्व क्षेत्रांमध्ये तेथील विद्यार्थी प्रगती करताना दिसत आहेत. मात्र आपल्याकडील विद्यार्थी रील बनवणे, रील बघणे, नाचणे गाणे अशा गोष्टींमध्ये व्यस्त आहेत. अगदी लहान वयात मुलांच्या हातामध्ये मोबाईल पडला आहे. विद्यार्थी मोबाईल मध्ये नक्की काय पाहत आहेत, परिणामी याविषयी पालकांना लक्ष ठेवणे शक्य होत नाही. विद्यार्थी नको त्या गोष्टी मोबाईल मधून पाहत आहेत. तरुण वयात विद्यार्थ्यांचे हार्मोन बदलत असल्यामुळे त्यांच्या शारीरिक व मानसिक बदलांचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर होत असतो. परंतु फार कमी वयात विद्यार्थी मोबाईल मध्ये नको ते पाहत असल्यामुळे हा हार्मोनल असंतुलनाचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसत आहे. विद्यार्थी प्रमाणाबाहेर आक्रमक बनत आहेत. सध्या मुलांबरोबरच मुली देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक बनल्याचे दिसत आहे. शहरांमध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध नाहीत. अनेक शाळांमध्ये मैदाने नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळणे कमी होत आहे. व त्यातच भर म्हणून मोबाईलच्या व्यसनामुळे विद्यार्थी मैदानापासून दूर जात आहेत. मैदानावर खेळत असताना हार आणि जीत या दोन गोष्टी जरी महत्त्वाच्या असल्या तरी यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खिलाडूपणा जिवंत राहत असे. अशावेळी एखादी हार देखील त्याला पचवता येत असे व त्यातूनच तो नवीन उमेद घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असतो. परंतु सध्या खेळण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये या गोष्टीचा अभाव दिसून येत आहे. तसेच सध्या अनेक पालकांना एक किंवा दोनच अपत्य असतात, त्यामुळे प्रत्येक पालक त्यांचे मोठ्या प्रमाणात लाड करतात त्यांच्या नको त्या मागण्या पूर्ण करतात. विद्यार्थी लहान वयात प्रगत तंत्रज्ञानयुक्त सारख्या महाग वस्तू पालकांकडे मागून त्यांनी न दिल्यास त्यांना वेगवेगळ्या प्रकारे भावनिक खेळ खेळतात. अंततः हताश होऊन पालक त्यांच्या मागण्या पूर्ण करत आहेत. परंतु हा फार मोठे संकट पालक स्वीकारताना दिसत आहेत. याविषयी बऱ्याच पालकांशी चर्चा केली असता, त्यांनी सांगितले की आमच्या लहानपणी आम्हाला काही सुविधा मिळाल्या नाहीत. तर त्या आपल्या पाल्यांना मिळाव्यात अशी त्यांची इच्छा आहे . यामुळे आता एक मोठा धोका असा दिसून येतो, की विद्यार्थ्यांना कोणतीही गोष्ट मागितल्यानंतर पालक लगेच उपलब्ध करून देतात. त्यामुळे भविष्यामध्ये जर त्यांना पाहिजे ती गोष्ट वस्तू मिळाली नाही तर ते स्वीकारणे त्यांना अवघड जाते. समाजामध्ये आपण यापूर्वी देखील अशी अनेक उदाहरणे पाहिले आहेत की, अतिशय उच्चशिक्षित डॉक्टर, अभियंता ,प्रतिष्ठित व्यक्ती एखादे अपयश पचवू शकले नाहीत, त्यासाठी त्यांना कोणापुढे मन व्यक्त करता आले नाही. व त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल देखील उचललेले आहे. त्यामुळे प्रत्येक पालकाची ही जबाबदारी आहे की, त्यांनी आपल्या पाल्यांना सुख सुविधा उपलब्ध करून देत असताना त्यासाठी किती कष्ट पडतात, आपल्याला काय काम करावे लागते. याची त्यांना जाणीव करून देणे गरजेचे आहे. कोणतीही गोष्ट सहज उपलब्ध होते म्हटल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याची किंमत राहत नाही. पूर्वीच्या काळी एकाच घरातील सदस्य एकमेकांचे कपडे वापरत असत. मोठ्या भावंडांचे कपडे छोटी भावंडे वापरताना त्यांना आनंद होत असे. परंतु आता एका घरातील सदस्य एकमेकांचे कपडे वापरण्यास कमीपणा समजतात. यासारख्या गोष्टी कमी प्रतीच्या वाटतात. परंतु त्यांचा फार मोठा परिणाम मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर होत असतो. याचा पालकांनी विचार करणे गरजेचे आहे आपल्या पाल्याला नवीन कपडे विकत घेताना आपल्या मोठ्या भावंडाचे लहान झालेले कपडे वापरायला त्याला प्रोत्साहित करणे देखील महत्त्वाचे आहे. पूर्वीच्या काळी जसे भावंडांमध्ये प्रेम पाहायला मिळत होते, तसे आता ते व्यावहारिक झाले आहे. पूर्वी आपण आपल्या घरातील प्रत्येकाला अन्नपदार्थ मिळेल याचा विचार करत असू परंतु आता दुर्दैवाने असे वातावरण फार कमी ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे यासाठी देखील पालकांनी लक्ष देणे मुलांना सांगणे गरजेचे आहे. अनेक कुटुंबांमध्ये आई-वडील दोघेही नोकरी करतात त्यामुळे पालकांकडे वेळेचा अभाव आहे. ते आपल्या पाल्यास वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे पालक आणि पाल्य यामध्ये थोडीशी दरी निर्माण झाल्यासारखे दिसते. पालक आणि पालक एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करून शकल्यामुळे घरात ताणतणाव निर्माण होतो. पालकांच्या अपेक्षा निश्चितच वाढलेल्या आहेत त्यामुळे बऱ्याच वेळा ते आपल्या पाल्याची तुलना इतर मुलासोबत करतात त्यामुळे यातून पुन्हा वेगळे ताणतणाव निर्माण होत आहेत. यासाठी प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याच्या क्षमता अभ्यासून त्याप्रमाणे अपेक्षा ठेवाव्यात पाल्यांच्या आवडीनिवडी सांभाळून त्यांना करिअरसाठी क्षेत्र निवडण्याची मुभा द्यावी. त्यामुळे आपला पाल्य त्याच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये मनासारखे काम करून यश संपादन करू शकेल. शेवटी प्रत्येक विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर होणे शक्य नाही. याची जाणीव प्रत्येक पालकांनी ठेवणे गरजेचे आहे. जेव्हा आपण असे म्हणतो की मुले, मुली ही मोबाईलच्या आहारी गेली आहे, त्यावेळी मुलांना मोबाईलच्या व्यसनापासून दूर करायचे असल्यास, पालकांनी देखील आपला स्क्रीन टाईम कमी केला पाहिजे. घरी असताना जास्तीत जास्त वेळ आपल्या पाल्यांना दिला पाहिजे. मुलांना फक्त सुख सुविधा देऊन त्यांची प्रगती होणार नाही. तर पालकांनी जास्तीत जास्त वेळ आपल्या पाल्यांना देऊन त्यांच्याशी सुसंवाद साधला पाहिजे. अनेक वेळा पाल्यांच्या काही गोष्टी आपणास पसंत नसतात परंतु आपण त्यामागील त्यांची भावना समजावून घेणे गरजेचे आहे. तरीही ते आपल्याला चुकीचे वाटल्यास तसे त्यांना व्यवस्थित समजावून सांगणे गरजेचे आहे. शेवटी आपला निर्णय आपल्या पाल्याला व्यवस्थित विश्वासात घेऊन सांगितल्यास ते देखील आपले निश्चितच ऐकतील. आता बरीच मुले आणि मुली हे व्यायाम करण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे पालकांनी देखील आपल्या पाल्यास घेऊन व्यायामाचे महत्त्व सांगितल्यास त्यांना ते पटेल. याची सुरुवात प्रत्येक पालकांनी स्वतःपासून केली पाहिजे. म्हणजे स्वतः नियमितपणे व्यायाम करत असल्यास, आपल्या पाल्यांना वेगळे सांगण्याची गरज पडणार नाही. तसेच खेळासोबत त्यांना एखादी कला जोपासता येत असेल, आवडत असेल तर त्यासाठी प्रोत्साहित करावे. यातूनच त्यांचे कलागुण विकसित होतील व त्यांच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये निश्चितच सकारात्मक बदल घडून आल्याचे दिसून येईल. आपल्या मुलांना आपली संस्कृती समजावी यासाठी आपले किल्ले, ऐतिहासिक स्थळे अशा ठिकाणांना भेटी देऊन, या स्थळांचे महत्त्व समजावून सांगावे. आपण भाग्यशाली आहोत की आपण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती, संभाजी महाराज यांच्या राज्यामध्ये राहतो. त्यांचा इतिहास मुलांना सांगून, या इतिहासाच्या माध्यमातून त्यांना देखील निश्चितच प्रेरणा मिळू शकते. आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी सांगितले होते की, आपला भारत देश 2030 पर्यंत महासत्ता बनू शकेल. परंतु दुर्दैवाने सध्या आपली तरुण पिढी मोबाईल मध्ये इतकी मग्न झाली आहे की, त्यामुळे असा विचार येतो की, त्यांचे ते स्वप्न प्रत्यक्षात न येता स्वप्नातच राहते, की काय अशी परिस्थिती आहे. त्यामुळे याबाबत शासनाने देखील विचार करणे गरजेचे आहे. किशोर अवस्थेत मुलांना मोबाईल वापरास बंदी करणे, सोशल मीडिया वापरण्यास बंदी करणे, विविध प्रकारच्या ऑनलाईन खेळांवर बंदी करणे, यासारखे तातडीचे उपाय करणे फार गरजेचे आहे. अन्यथा भविष्यामध्ये ही पिढी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम राहणार नाही. सध्या जशी विविध व्यसनांसाठी उपचार केंद्र स्थापन केली आहेत. तशी भविष्यामध्ये भ्रमणध्वनी दुष्परिणामामुळे, त्यासाठी व्यसनमुक्ती केंद्र उभारावी लागतील. असे व्हावे असे वाटत नसेल तर निश्चितच शाळा, पालक आणि पाल्य या तिघांनी गंभीरता पूर्वक विचार करून, एकत्रित प्रयत्न केल्यास असे वाईट दिवस भविष्यातील पिढींना येणार नाहीत, अशी अपेक्षा करूया. धन्यवाद. रचना: स्नेहयश.

Saturday, March 14, 2026

नशा - अकाली जीवन अंत्ययात्रा

व्यसनाधिनता ही जबरदस्त जीवन घातकी किड-दिमक आहे, ज्यामुळे आयुर्मान कमी करणे व दारिद्र्यला आमंत्रित करून कुटुंबातील उर्वरीत सदस्य आणि जोडीदार यांना कधीही न संपणाऱ्या अंधाराच्या गुहेत ढकलण्याइतके गंभिर सत्य आहे. अडाण्यापासुन उच्चशिक्षित वर्गातील तरुणांचा समावेश यात आपणास पाहायला मिळतो. अलीकडे युवकांमध्ये सर्वच प्रकारचे व्यसन वाढलेले आहे. त्यामुळे आपली प्रतिमा डागाळली जाते. समाजामध्ये असलेले स्थान, दर्जा टिकवायचा की त्याला सुरुंग लावायचा हे आपल्याच हातात असते. आपल्यामुळे कित्येकांची मने दुखावली जातात. आपण आपल्या मनमानीने वागतो. पण त्याचा इतरांना काय त्रास होतो, याचे आपण कधी आत्मपरीक्षण करत नाही. राहण्याच्या ठिकाणाचा विपरित मौहोल, वाट चुकलेले मित्रपरिवार आणि नकारात्मक परिस्थिती या गोष्टी व्यसनाधिनतेला पूरक ठरतात. व्यसनापासून चार हात लांब राहणे हा सुंदर जीवनाचा आस्वादी मूलमंत्र आहे. एकदा का व्यक्ती व्यसनाच्या जाळ्यात गेला , त्याची वापसी नगण्य. मौज आणि हौस म्हणून कधी कधी विविध आनंदमय कार्यक्रमांमध्ये केली जाणाऱ्या या जीवघेण्या चेष्टेवर पालकांनी वेळीच आवर घालणं अती आवश्यक असते. व्यसनाधिनता ही तात्कालिक आनंद देणारी प्रकृतीच्या विरूद्ध मार्गास नेणारी एक राक्षसी वृत्ती आहे. वर्तमान तरुणांनी आनंदासाठी अव्यवहार्य मार्ग कदापि निवडू नयेत वा त्यांना बळी पडू नये. आपोआप किंवा कालांतराने व्यसन निर्वाणाची शक्यता नसतेच.  केवळ नारदमुनी भेटले म्हणून वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला. असे प्रत्येका बरोबर नाही होऊ शकत. व्यसनाच्या आहारी गेलेली लोकं रात्रंदिवस स्वतःच्या आनंदासाठी जगतात. आपल्या जवळच्या व्यक्तींचा विचार करत नाहीत. आपल्या संसारावर, मुलाबाळांबर, आई-वडिलांवर जर त्याचे विपरीत परिणाम घडत असतील, तर असा उपदव्याप काय कामाचा ? त्यातून त्यांचं मानसिक संतुलन बिघडून आयुष्याचा एकूणच जीवन आलेख बिघडतो. यापेक्षा निपुत्रिक असणे बरे. वेळ मारून न नेता या गंभीर परिस्थितीत पालकांचे किंवा  व्यसनमुक्तीवर कार्य करणाऱ्या तज्ञ मार्गदर्शकांमार्फत समुपदेशन करून घ्यावे व या जीवघेण्या जाळ्याच्या विळख्यातून बाहेर पडावे. उपयोगी व आवडते छंद जोपासावेत. सकारात्मक कार्यमग्नता असावी. व्यसन परावृत्तीसाठी परिणाम कारक मार्गांचा अवलंब करावा. परंतु या ऐवजी धाडसी पण निरुपयोगी असे निर्णय अलीकडे आपल्या आजुबाजूला पाहायला मिळतात. व्यसनी व्यक्तीस कुटुंबातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या अथवा लग्न करून देणे हा त्याच्यावरचा रामबाण उपाय होऊच शकत नाही. पण समाजातील बुजुर्ग व्यक्ती कधी कधी असे अव्यावहारिक उपदेश देतांना दिसतात. आणि यामुळे आईवडिलांच्या आज्ञाधारक तरुणींच्या आयुष्याचे वाटोळ्याची निश्चिती केली जाते. ही तर विषपरीक्षा आहे, त्यातून शेवटी निराशा आणि शोकांतिकाच मिळणार. यांवर परिणाकारक उपाय म्हणजे विवाह जुळविताना चौकस असणे. मुलींनी उत्तम दर्जाचे व्यावसायिक शिक्षणाचा मार्ग निवडणे. दुर्दैवाने नशिबी मद्यपी आलाच तर शैक्षणिक, व्यावसायिक गुणवत्ता असल्यामुळं पुढील जीवनाची वाताहत लागणार नाही. आत्मनिर्भर असल्यामुळे होऊ घातलेली विपरीत परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचे धाडस कोण करणार नाही. माझ्या गुरूचा उपदेश: आयुष्यभर आईवडिलांच्या आयत्या संपत्तीवर जगलात तरी चालेल पण कोणत्याच व्यसनाच्या आहारी जाऊ नका. वयोवृद्ध मातापित्यांना आपल्या काळजाच्या तुकड्याचा आयुष्याचा व्ह्रास आणि अंत पचविणे हे नरकयातना पेक्षा कमी नाही. : स्नेहयश.

Sunday, March 1, 2026

संकटकाळीतल एकमेव ढाल: माता पिता

आई आणि वडील यांच्यासारखे दुसरे दैवत अथवा पर्याय असूच शकत नाही. अशोक , वय वर्ष 32 उंच पुरे शरीर, मजबूत शरीर बांधा, स्वतःवर भक्कम आत्मविश्वास, बायको,मुले सर्व काही सुरळीत. भल्या मोठ्या मेट्रोपॉलिटन शहरामध्ये कायम मोठ्या पगाराची सरकारी नोकरी , सर्व नियमित आणि चौकटीत सुरू असताना अचानक त्याच्या डोक्यात उजव्या बाजूला किंचितसे ... टिक टिक असे जाणवु लागले होते. कदाचित ते रक्तचापाशी संबंधित असू शकेल. मार्च व एप्रिल महिन्यात कामाचा व्याप जास्तीच असतो. कमी वेळात बरेच काही कार्यालयाचे काम पूर्ण करून द्यावे लागते. त्या अतिरिक्त ताणतणावाची कदाचित ती परिणिती ती असू शकेल. पण त्याच्या उच्चशिक्षित दिमाखात नको ते वाईट विचार येत होते. पुढच्या क्षणी त्याच्याबरोबर काय विपरीत होऊ शकेल या संदर्भात क्षणोक्षणी त्याच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. पेन किलर्स औषधी, गोळ्या घेऊन बघितल्या, पण त्यांचा फारसा काही उपयोग झाला नाही. दोन लहान मुले. पत्नी मुलांच्या निस्सिम प्रेमापोटी, पत्नी घाबरून जाऊ नये म्हणून तिला या संदर्भात थोडेसे काही डोके दुखते असे भासविले. त्यादरम्यान काय त्याचे भाग्य, चारशे किलोमीटर अंतरावरून योगायोगाने आई-वडील गावावरून मुलीला भेटण्यासाठी बालसाड ला आलेत. चार दिवसांनी तिच्याकडून मुंबईला मुलाला भेटण्यासाठी अशोककडे देखील आलेत. हेच ते आईवडील ज्यांनी अशोकला आजपर्यंत गरिबी व दुःखाचा स्पर्शदेखील होऊ दिला नव्हता. अशोक त्यांचा एकुलता एक मुलगा. अशोक आता जास्तच विचार करू लागला. त्यांना आपल्या मुलाला अशा केविलवाण्या अवस्थेत बघावे लागेल की काय हाच त्याचा मनात सातत्याने विचारचक्र सुरू होते. अशोक वरवर सामान्य असण्याचा आव आणत होता खरे, पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्याशी गप्पा करत असताना त्याला मात्र राहवले गेले नाही. त्याला होणारा त्रास त्यांना क्षणार्धात सांगून टाकला. दुसऱ्या दिवशी सकाळी मोठ्या इस्पितळात तपासून घेण्याबाबत चे नियोजन करण्याचा त्याच्या वडिलांनी गंभीर सल्ला दिला व त्याला ते स्वतःच इस्पितळात तपासण्यासाठी घेऊन जातील असे ठरले. त्यांनी अगदी छोट्या बाळासारखे त्यास दुसऱ्या दिवशी सकाळी मोठ्या दवाखान्यात नेले व सर्व चाचण्या करवून घेतल्या. चाचण्याअंती गंभीर काळजी करण्यासारखे काही खास निदर्शनास आले नाही. दोन पाच औषधी दिल्या गेल्या. पण त्यादरम्यान आई-वडिलांच्या सहवासाची ऊब अशोक साठी खूपच जगावेगळी होती. लहानपणापासून तर आतापर्यंत त्यांनी त्याची अनेकविध प्रकारे कशी काळजी घेतली त्या संदर्भात त्याच्या मनामध्ये विचारांचे चक्र फिरत होते. सामान्य शेतकरी कुटुंब, आईवडिलना चार अपत्य, त्यात अशोक सर्वात मोठा, आईवडिलांनी दिवसभर शेतात राबराब राबून कुटुंबाची सातत्यानी घेतलेली काळजी, ते सर्व त्याच्या नजरेसमोर येत होते. निसर्ग संकट,शेतमालाला व्यापार वर्गांकडून मिळणारा अन्यायी भाव या सर्व गोष्टी तर विपरीत होत्या. तरी देखील आपल्या मुलाबाळांवर त्या संदर्भात कोणत्याही प्रकारची नकारात्मक छाया पडू देता मुलांना व्यवस्थित मार्गस्थ केले होते. त्यांच्या पारंपारिक विचारसरणीनुसार जीवनाची व्याख्या म्हणजे कष्ट करणे व मुला बाळांचे संगोपन करणे हीच होय, त्या पलीकडे अजून वेगळे विश्व असते असे त्यांना दूरपर्यंत माहीतच नव्हते. त्यांनी सोसलेल्या कष्टाचा एक एक क्षण दररोज अशोक च्या मनामध्ये यायचा. मुलांवरचे मातृ पितृ मूल्य मात्र कधीही कमी झालेले त्याला आठवत नव्हते. निसर्गाची ती एक आगळीवेगळी अशी किमया आहे. आणि आता तर त्याच्या या जीवघेण्या दुखण्याने त्याला दूरवर आई-वडिलांशिवाय कोणीही दिसत नव्हते. त्याच्यासाठी फक्त त्याच सदृश्य प्रतिमा होत्या. थोडक्यात तो कोण आहे याचा त्याला विसरायला झाले होते आणि फक्त घरातील त्या चार चौकटीत आई वडील आणि स्वतः त्याला दिसत होता .पत्नी व मुलांविषयी विचार करणे देखील त्याच्या पचनी पडत नव्हते. थोडक्यात म्हणजे त्याने स्वीकारून घेतले होते की त्याचे थोडेच दिवस शिल्लक असावेत. पण काय ती ईश्वर किमया, आईवडिलांच्या पवित्र सानिध्यामुळे त्याचे ते दुखणे हळूहळू बरे व नंतर नाहीसे झाले. अशोकला बरे वाटायला लागले. आणि तो पूर्ववत बारा झाला. हीच ती मातापित्याची ईश्वरी कृपा. जोपर्यंत आईवडील आहेत तोपर्यंत आपल्याभोवती एक निसर्गशक्ती चे संरक्षक कवच असते, त्यांची काळजी घेणे म्हणजे स्वतःला सुरक्षित करणे हा अशोक चा वास्तविक अनुभव. सरासरी वरील प्रसंग हेच सांगतो की आई-वडील हे ईश्वराचे रूप असून त्यांच्या कष्टांची आणि प्रेमाची जाणीव ठेवणे हे प्रत्येक मुलाचे कर्तव्य आहे. त्यांच्या छत्रछायेखाली आयुष्य सुरक्षित राहते. "पैशाने सर्व काही मिळेलपण आईसारखा स्वर्ग आणि बापासारखी सावली कुठेच मिळणार नाही" असे मानले जाते. 'मातृदेवो भवपितृदेवो भव' ही आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. वडील म्हणजे एक अशी व्यक्तीजी स्वतःच्या स्वप्नांचा त्याग करून मुलांची स्वप्ने पूर्ण करणारी,कुटुंबाचा कणाकष्टाची सावली आणि निःस्वार्थ प्रेमाचे निस्सीम प्रतीक असणारे, मुलांच्या यशाचा आनंद साजरा करणारे आणि अपयशात पाठीशी उभे राहणारे ढाल असतात. आईबाबा हे जगातील इतके मोठे व्यक्ती आहेत, की ज्यांच्या कष्टाच्या घामाच्या थेंबाची परतफेड कोणत्याच मुलांना कोणत्याच जन्मी करणे शक्य नहीं. आणि त्याची परतफेड केली पाहिजे अशी अपेक्षा ते पण करत नाहीत. त्याचा गौरव म्हणजे तुमचे माझे समाजमान्य वर्तन ज्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावत नाही. आपल्या आयुष्यात दोनच लोक असे असतात ज्यांच्यावर, ज्यांच्या निर्णयावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवू शकतो. नंतर बोलू किंवा बघू या भ्रमात राहू नका. आजच त्यांच्याशी वेळ काढून गप्पा करा, त्यांची विचारपूस करा. त्यांनी केलेल्या संघर्षमय मेहनत प्रसंगावर चर्चा करा. खूप बरे वाटते त्यांना त्याचा यशस्वी भूतकाळ ऐकायला. काळावर नियंत्रण ठेवण्याएवढे तुम्ही, मी शक्तिवान नाहीत. आपल्या भारतीय संस्कृतीत आई वडिलांना देवाचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यांचा आदर करून त्यांच्या आज्ञाचे पालन करणे इतकेच नव्हे तर त्यांच्या उतारवयात संपूर्ण काळजी घेणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. अनुतात्या ना समर्पित. लेखक: स्नेहयश.